जालना : सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही दहावीचा पेपर जालना, यवतमाळमध्ये फुटल्याचे उघड झाले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेले सर्व दावे पहिल्या दिवशी फोल ठरले आहेत. दरम्यान, या पेपरफुटीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
जालन्यात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर आता याप्रकरणी बोर्ड काय निर्णय घेणार? याकडे सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. जालन्यानंतर यवतमाळमध्ये पेपर फुटला आहे. प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जालन्यातील बदनापूर येथील केंद्राबाहेरील एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्या. जालना शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट्स काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालक संतप्त झाले.
जालन्यातील बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तर पत्रिकाची झेरॉक्स मिळत होती. जालना जिल्ह्यात १०२ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा सुरू आहे.
कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा
दरम्यान, जळगावमध्ये दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. जळगाव शहरातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीबहाद्दरांकडून सर्रास कॉप्या पुरवल्या जात होत्या. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा प्रकार घडत होता.
...तर कारवाई
परीक्षा केंद्रावरती समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची माहिती आल्याने आम्ही परीक्षा केंद्र संचालक पर्यवेक्षक यांच्याकडे माहिती मागवली असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. विभागीय शिक्षण मंडळाच्या शिक्षा सूचीनुसार बडतर्फ करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे, मंडळ मान्यता रद्द करणे अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी सांगितले.