पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मजबुती देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पूर्णपणे सक्रिय झाल्या आहेत.
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या भव्य यशानंतर पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी 'जनसंवाद' उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात "राष्ट्रवादी पुन्हा" नव्याने उभी राहणार असल्याची चर्चा सुरू आहे.
अजित पवारांच्या निधनानंतरही पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले. जिल्हा परिषदेच्या ७३ जागांपैकी ५१ जागा पक्षाने जिंकून सत्ता कायम राखली. निवडणुकांमध्ये फारसा प्रचार नसतानाही मिळालेले हे यश अजित पवारांविषयी असलेल्या सहानुभूतीचे प्रतिबिंब मानले जात आहे. अजित पवारांनी १३ सप्टेंबर रोजी हडपसर विधानसभा मतदारसंघातून 'जनसंवाद' उपक्रमाची सुरुवात केली होती. त्याद्वारे नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या सोडविण्यावर भर दिला जात होता. सुनेत्रा पवार आता हा वारसा पुढे चालवत, नवीन जनसंवाद दौरा लवकरच सुरू करणार आहेत. यामध्ये त्या नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक निवारण करतील तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनमत जाणून घेतील. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जोम आलेला दिसून येतो असून, पक्षाचे स्थानिक स्तरावर प्रभावीपणे पुनर्बाधणी होत असल्याचे चित्र पुणे जिल्ह्यात दिसत आहे.
खंबीरपणे साथ देण्याचे आवाहन
नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी जुन्नर, खेड, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधला. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत, आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सदस्यांच्या निवडीबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा केली. अजित पवारांच्या स्वप्नातील विकास कार्य पूर्ण करण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.