मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अपघाताच्या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार का घेतली जात नाही, ऐनवेळी विमानाचा वैमानिक का बदलण्यात आला. विमानाला टेक-ऑफ घेण्यात वेळ का लागला, बारामतीत दृश्यमानता कमी असताना विमान उतरविण्याचा प्रयत्न का झाला, अपघाताबाबत अशा अनेक शंका उपस्थित होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला अपघातामागचे सत्य सांगावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
विधानसभेत गृहखात्यासह सहा खात्याच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना शेळके यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा मांडला. “२८ जानेवारीला बारामतीत जो विमान अपघात झाला त्या विमानात अजितदादा पवार खरेच होते का? इथपासून शंका उपस्थित होत आहेत. अजितदादांच्या विमानाला झालेल्या अपघाताबद्दल वेगवेगळे तर्क लावलेजात आहेत, तसेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विमान अपघाताच्या तपासावर दबाव असल्याने तपासातून काहीच निष्पन्न होणार नसल्याचे सांगितले जात आहे,” असे शेळके म्हणाले.
“अजित पवार यांच्या अपघातानंतरही आम्ही गप्प का? यामागे काही षडयंत्र आहे काय? अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवार यांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. मात्र, त्यांच्या निधनानंतर अपघाताला जातीय रंग दिला जात आहे. आमचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावे घेतली जात आहेत. आमच्या निष्ठा अजितदादांशी होत्या. त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारले. आम्ही सर्व सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय यांच्या पाठीशी उभे आहोत. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताबद्दल सभागृहात खुली चर्चा झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला अपघामागचे सत्य सांगितले पाहिजे,” असे शेळके म्हणाले.
गहुंजे स्टेडियमला अजितदादांचे नाव द्यावे
पुण्यातील गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव देण्यात यावे. तसेच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीतून काय निष्पन्न झाले याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी सुनील शेळके यांनी केली.