मुंबई : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मात्र योजनेचा लाभ नियमात बसणाऱ्या बहिणींनाच मिळणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, वेगवेगळ्या योजनांचा ताण सरकारवर असला तरी भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही, असे फडणवीस यांनी राज्यातील जनतेला आश्वासित केले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सत्ता येते जाते, राज्यातील प्रश्नांवर चर्चा करणे सोडून चहापानावर बहिष्कार टाकला आणि भलेमोठे पत्र दिले. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी महायुती सरकार तयार आहे. राज्यातील जनतेने महायुतीला पसंती दिली असली तरी बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. कारण नसताना आरोप केले तर उत्तर कसे द्यायचे हेदेखील अवगत आहे, असा इशारा अजित पवार यांनी मविआच्या नेत्यांना दिला.