पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर आली असून, २३ एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत संख्याबळाच्या जोरावर भारतीय जनता पक्षाला सहा जागा मिळणे निश्चित मानले जात असतानाच, पुण्याच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी भाजप पक्षश्रेष्ठी कोणाची निवड करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार जगदीश मुळीक यांना दिलेला शब्द पाळला जाणार, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या संघटन कौशल्याला झुकते माप मिळणार की ग्रामीण भागात ताकद वाढवण्यासाठी ‘ग्रामीण कार्ड’ खेळून कोणा तिसऱ्याचीच वर्णी लागणार, या पेचात भाजपचा मोठा ‘पॉवर गेम’ अडकला आहे.
पुणे शहरातून सध्या दोन प्रमुख नावे प्रबळ दावेदार मानली जात आहेत. पहिले नाव प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांचे असून, भाजपमध्ये निष्ठावंत आणि संघटनात्मक कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या नेत्यांना संधी देण्याची जुनी परंपरा आहे.
थोपटे- कंद ठरत आहेत अडसर
दुसरीकडे, आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित पाहता भाजपने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. शहरात पक्ष आधीच प्रबळ असल्याने तिथेच पुन्हा उमेदवारी देण्यापेक्षा ग्रामीण भागात जिथे अधिक संघर्षाची गरज आहे, तिथे पद देऊन संघटनात्मक मजबुती करण्याचा विचार वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचे समजते. याच रणनीतीमुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांची नावे चर्चेत आली.