नागपूर : अनेक ज्येष्ठ मराठा नेत्यांनी इतर मागासवर्गीय श्रेणीचे प्रमाणपत्र मिळवले असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या वक्तव्यात त्यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचाही उल्लेख केला होता. मात्र, सुप्रिया सुळे यांनी पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान दिल्यानंतर वडेट्टीवार यांनी तात्काळ ‘अनावधानाने नाव आले’ असे म्हणत खेद व्यक्त केला आणि आपले वक्तव्य मागे घेतले.
एका राज्यमंत्र्याने ओबीसी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी केला होता. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील जवळपास ९० टक्के म्हणजेच निम्मा मराठा समाज ओबीसी प्रमाणपत्र घेऊन बसला आहे. मनोज जरांगे यांना कदाचित माहिती नसेल, पण सुप्रिया सुळेंपासून अनेक मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्रे आहेत. आता ओबीसी सामान्य वर्ग आणि इतर वर्ग ओबीसी श्रेणीत येत असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सगळेच २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
विजय वडेट्टीवार यांच्या या आरोपावर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत कडक शब्दांत संताप व्यक्त केला. विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा निव्वळ खोटा आरोप केला आहे. त्यांना ही माहिती कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हे त्यांनी जाहीर करावे. त्यांच्याकडे मी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा काहीही पुरावा असेल तर तो त्यांनी सार्वजनिक करावा, अन्यथा बिनबुडाच्या आरोपांबद्दल जाहीर माफी मागावी, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले.
स्पष्टीकरण व दिलगिरी
सुप्रिया सुळे यांच्या आक्रमक पवित्रा आणि वादाच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी लगेचच आपली चूक मान्य करत खेद व्यक्त केला. ओबीसी प्रमाणपत्राबाबत माझी भूमिका मांडताना अनावधानाने सुप्रिया सुळे यांचे नाव माझ्या तोंडून आले. त्यांच्यावर कुठलाही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. या चुकीबद्दल मी खेद व्यक्त करतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, सुप्रिया सुळेंबाबत दिलगिरी व्यक्त केली असली तरी, बड्या मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्रे लाटल्याच्या आपल्या मुख्य भूमिकेवर ठाम असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. एकीकडे सत्तेचे फायदे घ्यायचे आणि दुसरीकडे ओबीसींच्या हक्कांवर डल्ला मारून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेला माझा नेहमीच विरोध राहील.