मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडोरच्या (डब्ल्यूडीएफसी) महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. त्यामुळे उत्तर भारताला पश्चिम किनारपट्टीशी जोडणारा महत्त्वाचा मालवाहतूक मार्ग पूर्णत्वास आला आहे. या प्रकल्पामुळे राज्याला लॉजिस्टिक्स आणि सागरी क्षमतेत मोठी भर पडणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीटी) येथे आज पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडोरवरील मालगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील १७८ किमीच्या या मार्गासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. एकूण सुमारे १,५०० किमी लांबीचा हा कॉरिडॉर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमधून जातो. न्यू उंबरगाव ते जेएनपीटी हा या प्रकल्पातील सर्वाधिक आव्हानात्मक टप्पा होता. दलदलीचा परिसर, डोंगररांगा; तसेच वैतरणा आणि उल्हास नदी परिसरातील कठीण भौगोलिक परिस्थितीत मरीन क्लेवर भराव, बोगदे, पूल आणि उड्डाणपूल उभारून ही 'मिसिंग लिंक' पूर्ण करण्यात आला. या मार्गावरून देशात प्रथमच डबल-स्टॅक कंटेनर गाड्या धावणार असून त्यासाठी चार बोगदे, शेकडो पूल आणि उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत.
जेएनपीटी आणि वाढवण बंदराला चालना
देशातील एकूण कंटेनर वाहतुकीपैकी सुमारे ५५ टक्के वाहतूक जेएनपीटीमार्फत होत असल्याचे सांगत, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत बंदराने ३८.२७ लाख टीईयू कंटेनरची हाताळणी केली असून त्यात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२९-३० पर्यंत जेएनपीटीची क्षमता एक कोटी टीईयूपेक्षा अधिक होईल, तर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमुळे महाराष्ट्र महत्त्वाची सागरी शक्ती म्हणून उदयास येईल, असे फडणवीस म्हणाले.