महाराष्ट्र

राहुल गांधी करणार पंढरीची वारी? विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसची मोर्चेबांधणी

महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या ओंजळीत घवघवीत यशाचे दान टाकल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आषाढी वारीत सहभागी व्हावे यासाठी प्रदेश कॉंग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या ओंजळीत घवघवीत यशाचे दान टाकल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आषाढी वारीत सहभागी व्हावे यासाठी प्रदेश कॉंग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याकडूनही पंढरीच्या वारीत सहभागी होण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

येत्या १७ जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी वारीसाठी राज्यभरातील संतांच्या पालख्या लवकरच पंढरपूरच्या दिशेने निघतील. आषाढी वारी महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळा मानला जातो. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस नेते राहुल गांधी हेसुद्धा या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसला होऊ शकतो फायदा

राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरुद्ध देशभर काढलेल्या भारत जोडो यात्रेचे फळ त्यांना लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेल्या यशातून दिसून आले. त्यामुळे आषाढी वारी या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्यात राहुल गांधी सहभागी झाल्यास त्याचा मोठा फायदा कॉंग्रेसला विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, असे समीकरण मांडले जात आहे.

शरद पवारही वारीत होणार सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच वारीत सहभागी घोषणा केली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबवला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा यात सहभाग असतो. शरद पवारांनीही यंदा बारामती ते इंदापूरच्या सणसरपर्यंतचे तब्बल १७ किलोमीटरचे अंतर पायी चालण्याचा निर्णय घेतला आहे.

NEET UG Re-Exam 2026 : 'नीट' पुनर्परीक्षेची तारीख जाहीर; नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर

Mumbai : राणी बागेत लवकरच सिंहांची जोडी येणार; गुजरात सरकारची मंजुरी

Mumbai : पश्चिम रेल्वेवर आज रात्री मोठा ब्लॉक; धीम्या मार्गावर ११.३१ वाजता शेवटची लोकल

Mumbai : ...तोपर्यंत पोलीस बँक खाती गोठवू शकत नाहीत; उच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक

राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या खुल्या गटातील नियुक्तीला चाप; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय