मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी ‘एएआयबी’मार्फत चौकशी लावली आहे. ‘एएआयबी’ही स्वतंत्र चौकशी संस्था असून ती केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. या चौकशी यंत्रणेला जगातील कोणत्याही चौकशी यंत्रणेची मदत घेता येते व त्यायोगे अपघाताची चौकशी करता येते, अशी तरतूद आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. तसेच, या घटनेची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार आता ही स्वतंत्रपणे चौकशी सुरू होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री असताना ‘एएआयबी’ची स्थापना करण्यात आली होती. आपल्या देशात विमान दुर्घटनेसंदर्भात स्वतंत्र चौकशी करण्याकरिता यंत्रणा पाहिजे म्हणून या चौकशी समितीची निर्मिती करण्यात आली होती. दुर्घटनेतील सत्य समोर आले पाहिजे आणि अपघातासंदर्भात मुळात दोनच गोष्टी या चुकीच्या असू शकतील. एकतर वैमानिकाचा दोष किंवा विमानाचा दोष. त्यामुळे अपघाताची सगळी चौकशी झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. पण, ‘एएआयबी’ला चौकशीचे सर्वाधिकार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून आ. रोहित पवार यांनी सातत्याने ‘अपघात’ की ‘घातपात’ या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे, अशी केलेली मागणी मान्य होऊन याबाबत चौकशी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही लिहिले होते पत्र
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सातत्याने अजितदादांच्या विमान अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चौकशीच्या मागणीसंदर्भात नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिले होते. आता, केंद्रीय मंत्रालयाकडून या विमान अपघाताची ‘एएआयबी’ चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे, आमदार रोहित पवारांच्या सातत्याच्या मागणीनंतर दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.