मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांनी जोरदार पसंती दिली आहे. २६ जानेवारी ते २० मे या अवघ्या ४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. कडक उन्हाळा आणि वाढती गर्दी या पार्श्वभूमीवर मुंबईकर आता आरामदायी प्रवासाकडे वळू लागत असल्याचे दिसत आहे.
मध्य रेल्वेने २६ जानेवारी ते २० मे २०२६ या कालावधीत ८ हजार ९९१ एसी लोकल सेवा चालवल्या आहेत. ही संख्या गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील ६ हजार ८३४ सेवांच्या तुलनेत ३१.६ टक्क्यांनी अधिक आहे. जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत एसी लोकल गाड्यांनी १.५० कोटी प्रवाशांना सेवा दिली. याचे दैनंदिन सरासरी प्रमाण १.३० लाख प्रवाशी इतके होते.
२६ जानेवारी ते २० मे २०२६ या कालावधीत प्रवाशांची एकूण सरासरी उपस्थिती प्रति सेवा १,६६४ इतकी नोंदवली गेली. ही संख्या २०२५ मधील प्रति सेवा १,४७४ प्रवाशांच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे. यामुळे प्रति सेवा वाहून नेल्या जाणाऱ्या सरासरी प्रवाशांमध्ये १२.९% वाढ झाल्याचे दिसून येते.
सेवांच्या संख्येत झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून दैनंदिन सरासरी प्रवाशांची संख्या २०२५ मधील ८७,५९६ वरून २०२६ मध्ये १,३०,०७५ पर्यंत वाढली आहे. तसेच, प्रति सेवा प्रवाशांचे प्रमाणही २०२५ मधील १,४७४ वरून २०२६ मध्ये १,६६४ पर्यंत सुधारले आहे. याचा अर्थ असा की, या मार्गावर सेवांची संख्या वाढलेली असूनही गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत.
मध्य रेल्वेच्या महसूलात झाली घसघशीत वाढ
याच कालावधीत एकूण प्रवाशांची संख्या २०२५ मधील एक कोटींवरून २०२६ मध्ये १.५० कोटींपर्यंत वाढली असून यामध्ये तब्बल ५० टक्के वाढ दर्शवते. याला अनुसरूनच, दैनंदिन सरासरी महसूल २०२५ मधील ३८.५० लाखांवरून २०२६ मध्ये ५६ लाखांपर्यंत वाढला आहे. तर या कालावधीतील एकूण महसूल गेल्या वर्षीच्या ४४.२७ कोटींच्या तुलनेत ६४.४० कोटींपर्यंत पोहोचला आहे. मे २०२५ मध्ये, सीएसएमटी-कल्याण-बदलापूर-टिटवाळा मुख्य मार्गावर सेवा सुरू झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील एसी लोकल सेवांची संख्या ६६ वरून ८० पर्यंत वाढली.
मध्य रेल्वेवर एकूण १०८ एसी लोकल सेवा
२६ जानेवारी २०२६ पासून सीएसएमटी -पनवेल विभागात एसी लोकल सेवा सुरू झाल्यामुळे एकूण एसी लोकल सेवांची संख्या ९४ वर पोहोचली आहे. तसेच मे २०२६ पासून आणखी १४ अतिरिक्त सेवांची भर पडल्यामुळे, मध्य रेल्वेवरील एकूण एसी लोकल सेवांची संख्या १०८ झाली आहे.