मुंबई : क्षुल्लक वादातून झालेल्या भांडणातून मित्राची हत्या करून आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. मोहम्मद अय्याज शेख आणि सद्दाम हुसैन आलम अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी साकिनपाका पोलिसांनी सद्दाम आलमविरुद्ध हत्येसह आत्महत्येचा गुन्हा नोंदविला आहे.
बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या या हत्या आणि आत्महत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. अयाज आणि सद्दाम हे दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून, गेल्या सहा महिन्यांपासून घास कंपाऊंड येथे कपड्याच्या कारखान्यात कामाला होते. दिवसभर काम केल्यानंतर ते दोघेही तिथे झोपत होते. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात सतत खटके उडत होते. बुधवारी रात्री ते दोघेही कारखान्यात आले होते. यावेळी त्यांच्यात जुन्या कारणावरून पुन्हा वाद होऊन कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी रागाच्या भरात सद्दामने कात्रीने मोहम्मद अय्याजच्या गळ्यावर वार केले होते. त्यात तो गंभीरररीत्या जखमी झाला होता. या घटनेनंतर तो प्रचंड घाबरला आणि त्याने कारखान्यात स्वतला गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी कारखान्याचे मालक आणि त्यांचा मुलगा तिथे आले. यावेळी त्यांना हा प्रकार दिसून आला. या घटनेनंतर त्यांनी साकिनाका पोलिसांना ही माहिती दिली. या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले.