मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातानंतर राज्यात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले होते. या घटनेनंतर अपघात की घातपात, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी ‘एएआयबी’चा २२ पानी प्राथमिक अहवाल जाहीर झाला. या अहवालानुसार, लँडिंगदरम्यान विमान प्रथम एका झाडाला धडकले आणि त्यानंतर खाली कोसळले, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या निष्कर्षावर माजी मंत्री छगन भुजबळांसह अनेक राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतले आहेत.
माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘विमान झाडावर आदळले असते, तर त्या झाडाचे स्पष्ट नुकसान झालेले दिसले असते. आम्ही घटनास्थळी गेलो असता, तेथे उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीने विमान झाडाला धडकले, असे सांगितले नाही. विमानतळावर शेकडो लोक स्वागतासाठी उपस्थित होते; तरीही अशा प्रकारची माहिती कोणीही दिलेली नाही’. तसेच, भुजबळ पुढे म्हणाले, ‘सीसीटीव्ही चित्रफितीत विमान हवेत कलंडताना आणि नंतर कोसळताना दिसते. परंतु झाडाला धडक दिल्याचा ठोस पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे ‘एएआयबी’च्या अहवालातील निष्कर्षांबाबत मला आश्चर्य वाटले’.