शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला.' असे वक्तव्य केले. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार हे टीका करताना म्हणाले की, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाने सुरु केला आहे." अशी टीका केली. तर, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित दोन पुस्तके संजय राऊतांना पाठवली आहेत. त्यांनी याचा अभ्यास करावा," असेदेखील आशिष शेलार म्हणाले.
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, "संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले ते तरी उद्धव ठाकरेंच्या सेनेला मान्य आहे का? यांची मस्ती आंबेडकरांच्या जन्मस्थळापर्यंत गेली आहे. ही खोटी माहिती पसरवणे अक्षम्य चूक आहे. नव्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु असून भाजपाला हे मान्य नाही. भाजपा याचा निषेध करत असून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी." अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजप नेते, प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडी १७ तारखेला भव्य मोर्चा काढणार आहे. मुंबईमध्ये निघणाऱ्या या मोर्च्याला आता भाजप 'माफी मांगो' आंदोलनाने उत्तर देणार असल्याची घोषणा केली. आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले की, "महाविकास आघाडीकडून वारंवार महापुरूषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात येत आहेत. या विरोधात भाजप मुंबईभर माफी मांगो निदर्शने करणार आहे."