मुंबई : बेस्ट उपक्रमात खासगीकरणाचा शिरकाव झाल्यानंतर उतरती कळा लागली आहे. बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या ३,९०२ बसेस होत्या, मात्र आता २४९ स्वमालकीच्या बसेस शिल्लक असून कंत्राटी बसेसचा ताफा २,५३२ इतका झाला आहे.
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बससेवेच्या ताफ्यात गेल्या दहा वर्षांत मोठा बदल झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. २०१६ मध्ये बेस्टच्या मालकीच्या तब्बल ३,९०२ बस रस्त्यावर धावत होत्या. मात्र जून २०२६ पर्यंत बेस्टच्या मालकीच्या बसांची संख्या अवघी २४९ राहिली आहे. त्याचवेळी भाडेतत्त्व पद्धतीने तब्बल २,५३२ बस सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेस्टचा स्वतःचा बसताफा मोठ्या प्रमाणात कमी होऊन खासगी भाडेतत्त्वावरील बसेसचे अवलंबित्व वाढले आहे.
२०१६ मध्ये बेस्टच्या बसमधून दररोज सुमारे २७.५३ लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यातून बेस्टला दररोज सुमारे ३.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र जून २०२६ पर्यंत दररोजच्या प्रवाशांची संख्या १८.३६ लाखांवर आली असून, दैनंदिन उत्पन्नही २.३२ कोटी रुपयांवर घसरले आहे.
गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत बेस्टच्या दररोजच्या प्रवासी संख्येत सुमारे ९.१७ लाखांची घट, म्हणजे जवळपास ३३ टक्के घट झाली आहे.
स्वमालकीच्या बसेसमध्ये ९३.६ टक्क्यांनी घट!
२०१६ मध्ये बेस्टकडे असलेल्या ३,९०२ मालकीच्या बसेसच्या तुलनेत २०२६ मध्ये स्वतःच्या बसेसची संख्या केवळ २४९ राहिली आहे. म्हणजेच बेस्टच्या मालकीच्या बसताफ्यात तब्बल ९३.६ टक्क्यांची घट झाली आहे.