मुंबई

राज्यावर रक्त तुटवड्याचे संकट, ८ ते १० दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा

अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते

प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी मुंबईसह राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि रक्तदान करणाऱ्यांनी रक्तदान करण्याकडे पाठ फिरवली आहे. मुंबईत दररोज ५०० ते एक हजार युनिट रक्ताची गरज भासते, तर राज्यात ३ ते ५ हजार युनिट रक्ताची गरज भासते. मात्र सध्यस्थितीत रक्तपेढ्यांमध्ये ४४ हजार ७२ युनिट रक्त उपलब्ध आहे. हा रक्तसाठा पुढील ८ ते १० दिवस पुरेल इतकाच आहे.

रक्तदान सर्वांत श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. मुंबईसह राज्यभरात राज्य रक्त संक्रमण परिषद मान्यताप्राप्त रक्तपेढ्या, पालिका, सामाजिक संस्था, मंडळे यांच्याकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करत गरजुंना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. मात्र मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाली. त्यामुळे रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदान शिबीर आयोजित करत रक्तदान करावे, असे आवाहन असून लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालक डॉ. साधना तायडे यांनी केले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील लोकसंख्या ११ कोटी २३ लाख ७४ हजार ३३३ होती. लोकसंख्येच्या तुलनेत २०२० मध्ये रक्तदान शिबिरांतून १५ लाख ४६ हजार ८०५ युनिट रक्त जमा झाले होते. तर २०२१ मध्ये आयोजित रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून १६ लाख ७३ हजार ९४७ युनिट रक्त जमा झाले होते. लोकसंख्येच्या तुलनेत रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या फारच कमी असून रक्तदान करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे आणि रक्तदान करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. तायडे यांनी केले आहे.

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

घरगुती गॅस पुरवठ्यावर सरकारची नजर; जिल्हास्तरीय समित्या स्थापन, अफवांवर कारवाईचा इशारा

ST डेपोच्या विकासासाठी भाडेकराराला ९८ वर्षांपर्यंत वाढ; सरकारकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी दाखल

Maharashtra Weather : हवामान खात्याचा अंदाज; राज्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा