मुंबई : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांचे १० हजार कोटींचे बजेट असून प्रत्येक उमेदवारासाठी १० कोटींची तरतूद शिंदे यांनी केल्याचा खळबळजनक दावा ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गुरुवारी सकाळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात एका शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपासून याबाबत विविध चर्चा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी लगेच करता येणार नाही, असे म्हणणारे सरकार आणि शिवसेना शिंदे गटाने महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक उमेदवारासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जेव्हापासून हे सरकार आले आहे, तेव्हापासून १,५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. एक किडनी विकण्याचे प्रकरण समोर आले आहे, पण अशी असंख्य प्रकरण आहेत.