मुंबई : मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणारा कचरा टाकण्याचा प्रकार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट्स (कचरा साचण्याची संवेदनशील ठिकाणे) हटवण्याची मोहीम अधिक वेगाने सुरू केली आहे. मुंबईतील २३१ गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट्सपैकी ४९ ठिकाणे पूर्णपणे हटविण्यात आली असून, ७३ संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या सवयींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्हीची नजर, दंडात्मक कारवाई आणि जनजागृती यांचा एकत्रित वापर सुरू ठेवला आहे. ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो, त्याठिकाणी देखरेख वाढवून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
मुंबईत २३१ गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट होते, त्यापैकी ४९ पॉईंट हटवण्यात आले आहेत. यात एम/पूर्व विभागात सर्वाधिक २३, जी/उत्तर मध्ये २३, पी/उत्तर मध्ये २२, एम/पश्चिम मध्ये २१ आणि जी/दक्षिण मध्ये १९ गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट्सची नोंद आहे. यावरून काही विभागांमध्ये कचरा टाकण्याची समस्या अद्याप गंभीर असल्याचे स्पष्ट होते.
या विभागात सीसीटीव्हीची नजर
जी/दक्षिण विभागात सर्वाधिक १३ कॅमेरे, एफ/दक्षिण मध्ये ११, एफ/उत्तर आणि एन विभागात प्रत्येकी ८, तर एस विभागात ६ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.