मुंबई: वैवाहिक वादातून पतीच्या संपूर्ण कुटुंबाला अडकवण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. केवळ मोघम आणि सरसकट आरोपांच्या आधारे पतीच्या नातेवाईकांना फौजदारी खटल्यात खेचणे हा कायद्याचा गैरवापर आहे, असे निरिक्षण नोंदवत न्यायालयाने पतीच्या आई-वडिलांसह भाऊ, भावजयीच्या विरोधातील गुन्हा रद्द केला.
नवी मुंबईच्या कामोठे पोलीस ठाण्यात विवाहितेने पती नजीम सय्यद याच्यासह सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांच्याविरोधात हुंडाबळी, छळ व अमानुष मारहाणअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पीडितेच्या आरोपानुसार लग्नानंतर तिचे दागिने सासूने काढून घेतले आणि नातेवाईकांनी तिला शारीरिक-मानसिक त्रास दिला.
या गुन्ह्याविरोधात पतीच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर न्या. रणजितसिंह भोसले यांच्या एकलपीठाने सुनावणी घेतली आणि संपूर्ण वस्तुस्थितीची पडताळणी केल्यानंतर पतीच्या नातेवाईकांविरोधातील गुन्हा रद्द करीत त्यांना मोठा दिलासा दिला.