मुंबई : मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या कोस्टल रोडवर पडलेले तडे, भेगा बुजवण्याचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्रीपासून तडे-भेगा बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले असून पालिकेच्या आदेशानंतर कंत्राटदारांची पळापळ झाली आहे. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे भेगा पडल्याचे पालिकेचे स्पष्टीकरण फोल ठरले आहे.
मुंबई शहर व उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरला असला तरी कोस्टल रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे. १४ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडवर तडे व भेगा पडल्याचे वृत्त जाहीर होताच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीवर टीकेची झोड उठली.
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही निकृष्ट दर्जाच्या कामावर बोट ठेवत पालिकेसह महायुतीवर टीकास्त्र सोडले. चहुबाजूंनी टीका होत असल्याने पालिका प्रशासनाची धावपळ उडाली आणि तांत्रिक कारणामुळे भेगा, तडे गेल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र शुक्रवार रात्रीपासून तडे, भेगा बुजवण्याचे काम कंत्राटदारांनी हाती घेतले आहे.
दोन दिवसांत काम फत्ते होणार!
कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे दररोज हजारो वाहने या मार्गावरून जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर पडलेले तडे, भेगा बुजवण्याचे काम रात्रीच्या वेळी करण्यात येत आहे. यामध्ये खराब झालेला संपूर्ण भाग काढून टाकला जात असून नव्याने बनवण्याचे काम सुरू करण्यात आले असून दोन दिवसांत डांबरीकरणाचे काम पूर्ण केले जाईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.