मुंबई : देवनार कचराभूमीत साचलेला कचरा साफ करण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्या निविदेत तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. त्यापैकी ‘नवयुग इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड’ या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. कचरा हटवण्यासाठी सुमारे २५४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच या कामासाठी किमान तीन वर्षे लागणार असल्याची माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
देवनार कचराभूमीतील कचरा हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने मे महिन्यात निविदा मागवल्या होत्या. तसेच याबाबतीत मे महिन्यात पालिका मुख्यालयात निविदा भरण्यापूर्वीची पूर्वबोली बैठक पार पडली होती. या बैठकीला २१ विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु, प्रत्यक्षात ३ निविदाकारांनी निविदा भरल्या असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
१२०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
देवनार क्षेपणभूमी १९२७ साली मुंबईच्या शहराच्या उपनगरातील शिवाजी नगर या परिसरात १२० हेक्टरवर उभारण्यात आली. या क्षेपणभूमीत १२०० मेट्रिक टन कचरा विल्हेवाटीसाठी आणला जातो. तसेच १३०० मेट्रिक टन डेब्रिजही या ठिकाणी टाकले आहे. या डंपिंग ग्राउंडचे काम वर्षभर तीन पाळ्यांमध्ये केले जाते.