मुंबई

‘एक है, तो सेफ है’चा नारा अदानींसाठी; राहुल गांधी यांनी उडवली मोदींची खिल्ली, धारावी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन

Maharashtra assembly elections 2024: पंतप्रधान नरेंद मोदींच्या ‘एक है, तो सेफ है’ या घोषणेवर टीका करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक तिजोरी दाखवली. या तिजोरीमधून त्यांनी एक चित्र बाहेर काढले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचा फोटो दाखवला. तसेच मुंबई येथील धारावीची जागा व त्याची ब्लू प्रिंट दाखवली.

Swapnil S

मुंबई : पंतप्रधान नरेंद मोदींच्या ‘एक है, तो सेफ है’ या घोषणेवर टीका करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक तिजोरी दाखवली. या तिजोरीमधून त्यांनी एक चित्र बाहेर काढले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचा फोटो दाखवला. तसेच मुंबई येथील धारावीची जागा व त्याची ब्लू प्रिंट दाखवली. मोदींच्या ‘एक है, तो सेफ है’ या घोषणेचा अर्थ आम्ही तुम्हाला यातून दाखवत असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी मोदींची खिल्ली उडवली.

सोमवारी बीकेसीतील सोफिटॉल हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘एक हैं, तो सेफ हैं’ घोषणेतून देशात फक्त एकच ‘सेफ’ आहे हे दिसत आहे. धारावीच्या पुनर्विकासाला विरोध नाही, पण धारावीकरांच्या मुळावर उठून विकास होत असेल तर आमचा विरोध आहे. मविआचे सरकार सत्तेत येताच धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करू, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली असून त्यांच्या या भूमिकेला आपले समर्थन असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरू आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असून मोदींची घोषणा ‘एक हैं, तो सेफ हैं’ म्हणजे फक्त अदानी व मोदी ‘एक हैं आणि सेफ ही हैं’, असा जोरदार प्रहार राहुल गांधी यांनी यावेळी केला.

यावेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एक बंद तिजोरी (सेफ) सादर करून पत्रकारांसमोर ती उघडली. त्यात मोदी आणि अदानींचा फोटो आणि धारावीचा नकाशा ठेवण्यात आला होता. अदानी व मोदी देश लुटण्यासाठी ‘एक है, तो सेफ है’चा नारा देत आहेत, असा आरोपही तिजोरी दाखवत राहुल गांधी यांनी केला.

देशातील सर्व विमानतळ, संरक्षण साहित्य बनवण्याचे काम, बंदरे, उर्जा निर्मिती प्रकल्प सर्व काही एकाच व्यक्तीच्या स्वाधीन करण्यासाठी भाजप सरकार काम करत आहे. भाजपची नजर मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याशिवाय हे होणे शक्य नाही, असा हल्लाबोल करत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर धारावीकरांच्या इच्छा, अपेक्षानुसार त्यांचे हित जोपासत हा प्रकल्प राबविला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.

मविआची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांचे ३ लाखांचे कर्ज माफ करणार, सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, कांदा व कापसाला योग्य हमी भाव, महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये व मोफत बस प्रवासाची सुविधा, राजस्थानच्या धर्तीवर २५ लाखांचा आरोग्य विमा दिला जाईल. बेरोजगारांना महिना ४ हजारांचा भत्ता तसेच २.५ लाख रिक्त सरकारी जागांची भरती केली जाईल. जातनिहाय जनगणना करणे व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवणे यावर भर दिला जाईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार