मुंबई : अभियांत्रिकी प्रवेशाच्या पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांपैकी केवळ २५ हजार ६५० म्हणजे १८ टक्के विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी एक दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे.
सीईटी कक्षाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली यादी ३१ जुलै रोजी जाहीर केली. पहिल्या फेरीसाठी तब्बल १ लाख ९९ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश देण्यात आला. यापैकी १५ हजार ८५२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक होते. या विद्यार्थ्यांना १ ते ३ ऑगस्टपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणे आवश्यक होते. मात्र पहिल्या यादीमध्ये प्रवेश मिळालेल्या १ लाख ४४ हजार ७७६ विद्यार्थ्यांपैकी केवळ २५ हजार ६५० विद्यार्थ्यांनी ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेश घेतले आहेत. सुमारे १८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे अन्य पसंतीक्रम मिळालेल्या व गुणवंत विद्यार्थ्यांनी देखील प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे सीईटी कक्षाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमालाही मुदतवाढ
एमबीए/एमएमएस या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १ ते ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली होती. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही सीईटी कक्षाने एक दिवसाची मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल.