गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली. पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजाने रविवारी हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरातील सखल भागात पाणी साचले होते. पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नाही, वाहतूक सुरळीत होती; मात्र दुपारी पाऊस ओसरला. रविवार सुट्टी असल्याने सकाळी गणपती दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई व उपनगरांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबईत मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावली. रविवारी सकाळीही पाऊस जोरदार सरीने कोसळला. दादर, कुर्ला, वडाळा, चेंबूर, परळ, सायन तसेच पश्चिम उपनगरांत वांद्रे, अंधेरी, मालाड, गोरेगाव, कांदिवली परिसरात जोरदार पाऊस कोसळला. सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले होते.