मुंबई : ‘भोंदूबाबा अशोक खरातच्या माध्यमातून सरकारमधीलच काही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत होते. मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्यासाठी त्यांनी कारस्थान रचले होते’, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी विधानसभेत केला.
विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना आव्हाड यांनी खरात प्रकरणावरुन सरकार आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले. या प्रकरणात अंधश्रद्धा, जादूटोणा आणि राजकीय हस्तक्षेप यांचा धोकादायक संगम झाल्याचा आरोप करत आव्हाड म्हणाले, काही मंत्री आणि आमदार खरातकडे पूजेसाठी जात होते. संत तुकाराम, ज्ञानेश्वर आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी घडणे अत्यंत दुर्दैवी आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ईशान्येश्वर देवस्थान परिसरात अनेक बांधकामे
सरकारी निधीचा गैरवापर करून खरात अध्यक्ष असलेल्या ईशान्येश्वर देवस्थान परिसरात अनेक बांधकामे करण्यात आली आहेत. या सर्व गोष्टींना सरकारकडून खरातला निधी पुरवण्यात आला. खरातसोबतच या ट्रस्टमधील इतर सदस्यांच्या आर्थिक आणि जमिनींच्या व्यवहारांची चौकशी करण्यात यावी. खरातकडे मागील २० वर्षांतील अनेक राजकीय गोष्टींची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. तसेच खरातकडे अनेक नेत्यांची गुपिते असल्याने त्याच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्याला २४ तास सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्याची मागणीही आव्हाड यांनी केली.
पत्रकाराच्या खून प्रकरणाचा संदर्भ
नाशिक जिल्ह्यात २००७ साली झालेल्या एका पत्रकाराच्या खून प्रकरणाचा संदर्भ देत आव्हाड यांनी खरातच्या या गुन्ह्यांची माहिती प्रशासन, पोलीस आणि काही राजकीय व्यक्तींना आधीपासून होती. त्यावेळीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. हे गुप्तचर खात्याचे अपयश आहे. काही अधिकाऱ्यांनी पैशांच्या मोबदल्यात खरात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. कोणत्या अधिकाऱ्यांनी किती पैसे घेतले, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.