अभिषेक पाठक/मुंबई :
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कल्याण ते मुरबाड रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील १८ गावांमधील सुमारे १५१.४४ हेक्टर जमीन या २८ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी संपादित केली जाणार आहे.
राज्य सरकारने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली असून, बाधित जमीन मालकांना त्यांच्या हरकती, सूचना किंवा दावे सक्षम प्राधिकरणाकडे मांडण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. गेल्या जवळपास एका दशकापासून केवळ कागदावर असलेला हा ८३६ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आला असून, यामुळे या परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा प्रस्तावित रेल्वे कॉरिडॉर कल्याणला आंबिवली आणि टिटवाळा मार्गे मुरबाडशी जोडणार असून, यामुळे मुरबाड तालुक्याला थेट रेल्वे संपर्क मिळणार आहे. २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम म्हणून हा प्रकल्प पुढे नेण्यात आला. सर्व प्रशासकीय मान्यता, निधी आणि तांत्रिक सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर केली, ज्यामुळे भूसंपादन प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.
या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे २१४ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून त्यापैकी १५१.४४ हेक्टर जमीन पहिल्या टप्प्यात संपादित केली जाईल. यामध्ये कल्याण तालुक्यातील १० गावांमधील (मोहने, अटाळी, आंबिवली, बाल्याणी, मोहिली, रेवती, नवगाव, कोळिंब, केलाणी आणि मामनोली) ७१.८६ हेक्टर आणि मुरबाड तालुक्यातील ८ गावांमधील (पोटगाव, घोरळे, नांदणी, पाषाणी, देवपे, शास्त्रीनगर, माळीनगर आणि मुरबाड शहर) ७९.५७ हेक्टर जमिनीचा समावेश आहे.