मुंबई : `लाडकी बहीण` योजना कधीही बंद पडणार नाही, अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणीभांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने `जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी` या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घडविली. भांडे घासून मिळणाऱ्या ५०० रुपयांत कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न होता. मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला, असे म्हणताना एका वृद्ध महिलेचा गळा दाटून आला.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत `लाडकी बहीण` योजना बंद होणार नाही. यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल, याचाही विचार आम्ही करतो, असे आश्वासन दिले. या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती तर आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव होता. आम्ही कधी विमान पाहिले नव्हते. मात्र आता आम्ही त्यातून प्रवासही केला. गेल्या दोन दिवसांत आम्हाला स्वर्गासारखी अनुभूती मिळाली, असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.
या भेटीत महिलांनी विनंती केली की, सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन पातळीवर या मागणीचा विचार करू, असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना ‘निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहील, हे ऐकल्यावर मन मोकळे झाले, असे एका महिलेने सांगितले.