हर्षवर्धन सपकाळ (संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; म्हणाले, "मतदानाआधीच ‘घोडेबाजार’...

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मुक्त व निष्पक्ष प्रक्रिया मोडीत काढली जात असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केली

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (दि.५) पत्रकार परिषद महायुती सरकारवर जोरदार टीका केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘मुक्त व निष्पक्ष’ प्रक्रियेचा पद्धतशीरपणे ऱ्हास केला जात असल्याचा गंभीर आरोप सपकाळ यांनी यावेळी केला.

महायुतीच्या सर्वोच्च नेतृत्वावर थेट आरोप

सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवल्याचा आरोप केला. मतदानाआधीच ‘घोडेबाजार’ सुरू झाला असून, विरोधक संपवण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांनी स्वीकारली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

“लोकशाहीत निवडणुका नियमित असतात. पण आजचे सरकार विरोधकच नकोत, अशी भूमिका घेत आहे,” असे म्हणत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात सहा बिगर-काँग्रेस मंत्र्यांचा समावेश होता, याची आठवण करून दिली.

‘बिनविरोध’ विजयासाठी दबाव व धमक्या

सपकाळ म्हणाले, “बिनविरोध विजय मिळवण्यासाठी विरोधी उमेदवारांना अर्ज दाखल करू दिले जात नाहीत, धमक्या दिल्या जात आहेत, दबाव तंत्र वापरले जात आहे. हे सर्व पोलीस व प्रशासनाच्या उघड पाठिंब्याने सुरू असून, निवडणूक आयोग मूकदर्शक बनला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

बिनविरोध जागांवर NOTA ची मागणी

ज्या मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तिथेही मतदारांना NOTA (None of the Above) चा पर्याय द्यावा, अशी मागणी करत मतदानाचा घटनात्मक हक्क अबाधित ठेवण्यावर सपकाळ यांनी भर दिला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर घणाघात

सपकाळ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर तीव्र टीका केली. “अध्यक्षांनी राजकीय पक्षपात बाजूला ठेवणे अपेक्षित असते. मात्र, पहिल्याच कार्यकाळात त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याची मोडतोड करून लोकशाही आणि संविधानावर घाला घातला. त्याच उद्देशाने त्यांना दुसरा कार्यकाळ देण्यात आला,” असा आरोप सपकाळांनी केला.

महानगरपालिका निवडणुकांत हस्तक्षेपाचा आरोप

नार्वेकर आपल्या नातेवाईकांच्या फायद्यासाठी महानगरपालिका निवडणुकांत हस्तक्षेप करत असल्याचा आणि विरोधी उमेदवारांना अडवण्यासाठी अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. या प्रकरणी राष्ट्रपतींकडे औपचारिक तक्रार करून नार्वेकरांना पदावरून हटवण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध, चौकशी दिखाऊ

निवडणूक आयोगाने पुराव्यांची मागणी केल्यावर सपकाळ म्हणाले, “धमकीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत, पीडितांची साक्षही आहे. मात्र सादर करण्यात आलेली चौकशी ही केवळ शब्दांची कसरत असून अध्यक्षांना वाचवण्याचा प्रयत्न आहे.”

महायुतीतील वाद म्हणजे ‘नुरा कुस्ती’

“ही भांडणं खरी नाहीत, ही सगळी ‘नुरा कुस्ती’ आहे," असे सत्ताधारी महायुतीतील तिन्ही पक्षांमधील सार्वजनिक वादांवर भाष्य करताना सपकाळ यांनी म्हटले.

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Baramati : शारीरिक संबंधांसाठी दबाव अन् 'त्या' गोळ्यांचा डोस; MPSC करणाऱ्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल