मुंबई : प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी झाडांचे संवर्धन काळाची गरज आहे. यंदाच्या पावसाळ्यात ५० हजार झाडांची लागवड करण्याचे उद्दीष्ट मुंबई महापालिकेने ठेवले असून सोमवार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत २०० झाडांची लागवड करण्यात आली.
जपान व मलेशियाचे राजदूत यांनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात प्रातिनिधीक स्वरुपात झाडांची लागवड केली. तसेच मुंबईतील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मलेशियाचे राजदूत अहमद झुवेरी युसुफ आणि जपानचे राजदूत फुकहोरी यसुकता यांनी वृक्षारोपण केले. कांचन आणि चाफा वृक्षांची त्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात लागवड केली. यावेळी विद्यार्थ्यांशीही दोन्ही देशांच्या राजदूतांनी संवाद साधला. तसेच यंदाच्या पर्यावरण दिनाच्या मोहिमेसाठी पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मुंबईत सुमारे ३३ लाख वृक्ष आहेत. गत दोन वर्षांत ४ लाख स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड ही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यंदाच्या नागरी वनीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली.
बहावा, अंजन, कांचन, अर्जुन झाडांची लागवड
बहावा, अंजन, बकुळ, कांचन, अर्जुन, ताम्हण, बिवळा, आवळा, चिंच, आंबा, वड, पिंपळ, मोह, उंबर, पुतरंजिया यासारखी विविध स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड या मोहीमे अंतर्गत करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागातून ही वृक्ष लागवड करण्यात आली. येत्या काळात मुंबईतील वनीकरण वाढवण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय नौदल तसेच अन्य विभागांच्या जागा शोधून त्याठिकाणी वनीकरण करण्यात येणार आहे.