मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले आहेत. या आंदोलकांच्या सोयीसाठी राज्यासह मुंबई महानगरातून जेवण पाठविण्यात येत आहे. जेवण, पाण्याचा ओघ वाढल्याने काही ठिकाणी अन्नाची नासाडी झाल्याने आंदोलकही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. तर मुंबई महापालिका मुख्यालय आणि सीएसएमटी परिसरात काही ठिकाणी कचरा जमा झाल्याचे दिसत होते.
मराठा आरक्षणासाठी गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागातून मराठा आंदोलक सीएसएमटी परिसरात दाखल झाले आहेत. आंदोलक चारचाकी वाहनांमधून आपल्यासोबत शेगडी, सिलेंडर आणि तांदूळ, डाळी घेऊन आले आहेत. तर अनेक आंदोलक मुंबईतील हॉटेल, पदपथ विक्रेते यांच्यावर अवलंबून होते. मात्र, आंदोलकांच्या ऐनवेळी सीएसएमटी परिसरातील हॉटेल, खाऊ गल्ली, बंद केल्यामुळे जेवणाची प्रचंड गैरसोय झाली. याचे संदेश राज्यभरात पसरल्याने मुंबई राज्यभरातून अन्नधान्याचा पुरवठा सुरू झाला.
कचऱ्याचे ढीग
आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात कचऱ्याचे डब्बे मोठ्या प्रमाणात नसल्याने आंदोलकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सायंकाळपर्यंत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. महापालिका मुख्यालयाच्या गेटवरच कचरा पडला आहे. सायंकाळी कचरा उचलण्यासाठी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी दाखल झाले. मात्र आंदोलकांची हजारोंची संख्या आणि तुलनेने स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले होते.