पाणी जपून वापरा! मीरा-भाईंदरमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांवर परिणाम?  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

पाणी जपून वापरा! मीरा-भाईंदरमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांवर परिणाम?

एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल (IOD) यांचा पावसावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

किशोरी घायवट-उबाळे

मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने ७ मे रोजी शहरातील काही भागांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणीपुरवठ्यात २४ तासांची कपात जाहीर केली आहे.

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाच्या माहितीनुसार, जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा ७ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ८ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र, या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार असून, नागरिकांना कमी दाबाने आणि उशिराने पाणी मिळण्याची शक्यता आहे.

उशिरा येणाऱ्या मान्सूनच्या शक्यतेमुळे निर्णय

'मिड-डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, २३ एप्रिल रोजी जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल (IOD) यांचा पावसावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

शहराला दररोज किती पाणीपुरवठा?

एमबीएमसीच्या आकडेवारीनुसार, ५ मे रोजी शहराला एकूण १९९.३८३ दशलक्ष लिटर प्रतिदिन (MLD) पाणीपुरवठा करण्यात आला. यामध्ये एमआयडीसीकडून ११७.०५७ MLD, स्टेम प्राधिकरणाकडून ८२.३२६ MLD इतका पाणीपुरवठा करण्यात आला होता.

महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ठाण्यातही पाणीपुरवठा खंडित

दरम्यान, ठाण्यातही अशाच प्रकारची पाणीपुरवठा कपात जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने (टीएमसी) दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीकडून करण्यात येणाऱ्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे ७ मे दुपारी १२ ते ८ मे दुपारी १२ वाजेपर्यंत काही भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बारवी पाइपलाइन दुरुस्तीचे काम

जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील बारवी ग्रॅव्हिटी पाइपलाइन क्रमांक १, २ आणि ३ च्या तातडीच्या दुरुस्ती आणि अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. या काळात दिवा, मुंब्रा (प्रभाग २६ आणि ३१ मधील काही भाग वगळता) आणि कळवा परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

'या' भागांनाही फटका

रुपादेवी पाडा, किसन नगर क्रमांक २, नेहरू नगर (वागळे प्रभाग समिती), लोअर कोलशेत गाव (मानपाडा प्रभाग समिती) या भागांतील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्राचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : अंधेरी सब-वे ‘उड्डाणपूल’ अशक्य; सल्लागाराचा मुंबई महापालिकेला अहवाल सादर 

FDI साठी कार्यपद्धती; अर्जांवर आता तीन महिन्यांत निर्णय, नवी नियमावली जाहीर, प्रक्रिया होणार कागदाशिवाय

Mumbai : चार्जिंग गन पॉइंट चोरीला; शिवाजी नगर डेपोतील धक्कादायक प्रकार उघडकीस

जहाजांवर अडकलेल्या ५० खलाशांची सुटका करा; उच्च न्यायालयाचे सक्त आदेश