मुंबई

मीरा रोडमध्ये पार्किंगच्या वादातून हिंसाचार; ६५ जणांवर गुन्हा दाखल

मंगळवारी (दि. २१) सकाळी मीरा रोडच्या डाचकुल-पाडा परिसरात पार्किंगच्या वादातून उसळलेल्या हिंसाचाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या झटापटीत ३ ते ४ जण जखमी झाले असून, ३० हून अधिक ऑटोरिक्षांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेहा जाधव - तांबे

मंगळवारी (दि. २१) सकाळी मीरा रोडच्या डाचकुल-पाडा परिसरात पार्किंगच्या वादातून उसळलेल्या हिंसाचाराने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या झटापटीत ३ ते ४ जण जखमी झाले असून, ३० हून अधिक ऑटोरिक्षांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी १५ हल्लेखोर आणि सुमारे ५० अज्ञात व्यक्तींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक व्यक्तींनी रस्त्यावर आपली वाहने धुत असलेल्या ऑटोरिक्षा चालकांना रस्ता अडवू नका अशी सूचना केली. या किरकोळ वादातून वादविवाद वाढला आणि रागाच्या भरात एका तक्रारदारावर हल्ला करण्यात आला. काही वेळातच आरोपींनी जवळच्या भागातून आणखी लोकांना बोलावून घेतले आणि कुऱ्हाडी, काठ्या, विळ्या आणि बांबू घेऊन सुमारे ५० जणांनी एकाच वेळी हल्ला चढवला.

या हल्ल्यात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून, एका व्यक्तीच्या डोक्याला खोल जखम झाल्यामुळे टाके घालावे लागले आहेत. जमावाने परिसरातील अनेक ऑटोरिक्षांवर दगडफेक आणि तोडफोड केली, ज्यामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

पोलिसांवर स्थानिकांचा संताप

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतरही सुमारे एक तास उशिराने पोलीस घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. रहिवाशांनी असा आरोप केला आहे की, काही उपद्रवी घटक नियमितपणे त्या भागात गाड्या धुण्याच्या बहाण्याने ड्रग्जशी संबंधित कारवायांमध्ये सहभागी असतात आणि परिसरात दहशत निर्माण करतात. त्यांनी पोलिसांकडे कडक गस्त आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे.

मंत्री सरनाईक आणि आमदार मेहता घटनास्थळी

घटनेनंतर राज्याचे वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रहिवाशांशी संवाद साधत आश्वासन दिले की, “हिंसाचार करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. जबाबदारांवर जलद आणि कठोर कारवाई केली जाईल.”

काशीगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांनी सांगितले की, “या प्रकरणात एकूण ६५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न (कलम ३०७), गंभीर दुखापत, दंगल, बेकायदेशीर जमाव तयार करणे, प्रतिबंधित शस्त्रांचा वापर यांसह विविध गंभीर कलमांखाली कारवाई सुरू आहे.”

सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, तणावाची स्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त

गोव्यात नाइट क्लबमधील अग्निकांडात २५ जणांचा मृत्यू; सहा जण जखमी

संचार साथी : ‘बिग ब्रदर’चा डिजिटल अवतार

मनुपेक्षा मेकॉले चांगला!

आजचे राशिभविष्य, ८ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत