मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर, येत्या आठवड्यात म्हणजे सोमवार, मंगळवारपासून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, या संपूर्ण परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यंदा मान्सून लांबल्यामुळे मुंबईकर पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहत आहेत. जून महिन्यातील पावसाने सरासरीची पातळी गाठलेली नाही. मुंबईची जूनची सरासरी ५२६ मिमी असताना, सांताक्रूझ येथे १३ मिमी आणि कुलाबा येथे केवळ ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळी दक्षिण मुंबईच्या काही भागांत हलक्या सरी कोसळल्या असल्या, तरी या तुरळक पावसामुळे शहरात गारवा निर्माण होऊ शकला नाही.
दोन्ही वेधशाळांमध्ये तापमान ३५ सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा ३ सेल्सिअसने अधिक होते. हवामान विभागाने संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, सोमवारी वादळी वारे, मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे.