मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात टाटा कंपनीच्या मातेश्वरी कंत्राटदाराच्या ४०० बसेस भाडेतत्त्वावर चालवण्यात येतात. गेल्या काही महिन्यांत भाडेतत्त्वावरील सीएनजी बसेसना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सीएनजी बसेसना लागणाऱ्या आगीमुळे बसवाहक, चालक यासह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आता मातेश्वरी कंत्राटदाराच्या ४०० सीएनजी बसेसची तपासणी करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. दरम्यान, यात १२ गाड्या सदोष आढळल्यानंतर दोष दूर करण्यात येत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
बेस्ट उपक्रमाच्या ताब्यात स्वमालकीच्या बसेसची संख्या कमी होऊन भाडेतत्त्वावरील बसेसची संख्या वाढत आहे. भाडेतत्त्वावरील बसेसना आग लागल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने भाडेतत्त्वावरील बसेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, बेस्ट समितीच्या बैठकीत समिती सदस्य अजय सिंह यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत काही चालक बसगाड्या बसथांब्यावर थांबवत नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. तसेच बेस्ट बसगाड्यांचे अनेक अपघात होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी बेस्टच्या प्रतिक्षानगर आगारात दोन बेस्ट बसला आग लागण्याची घटना घडली होती. तर कुर्ला येथे एका बसला, त्यानंतर सांताक्रुझ बस आगारातही बसला आग लागली होती.
या घटनेत बहुतांश बस सीएनजीवर धावणाऱ्या मातेश्वरी कंत्राटदाराच्या असल्याने खबरदारी म्हणून बेस्ट उपक्रमाकडून ताफ्यातील ४०० बसची तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपक्रमाकडून हरकतीच्या मुद्याबाबत देण्यात आली.
१२ बसगाड्यांमधील तांत्रिक समस्या केली दूर
या सर्व गाड्यांची तपासणी पूर्ण करण्यात आल्यानंतर १२ बसगाड्यांमध्ये सदोष वायरिंग व अन्य काही तांत्रिक समस्या आढळल्याचे सांगण्यात आले. हे दोष दूर करून या बस टप्प्याटप्याने सेवेत दाखल करण्यात येत असल्याचेही उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले. तर बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी, चालकांचे प्रशिक्षणावर भर देतानाच होणारे अपघात टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे सूचविले आणि यावर सविस्तर माहिती प्रशासनाने द्यावी, असे स्पष्ट करत हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.