मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वर्सोवा ते दहिसर थेट उन्नत मार्ग साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामात झाडांचा अडथळा निर्माण झाला असून तब्बल एक हजार झाडांचा बळी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे झाडे कापल्यानंतर १९ हजार ५७३ झाडांचे पुनर्रोपण पनवेल परिसरात करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
वर्सोवा इंटरचेंज ते गोरेगावच्या बंगूरनगरदरम्यान १८४ झाडे तोडण्यात येणार असून १६४ झाडांचे पुनर्रोपण (ट्रान्सप्लांटेशन) करण्यात येणार आहे. यारी रोड बोगदा परिसरातील झाडांच्या पुनर्रोपणाला प्राधान्य देण्यात येणार असून त्याच्या बदल्यात ३,७९५ नवीन झाडांचे पुनर्रोपण मुंबई बाहेर करण्यात येणार आहे. बंगूरनगर ते मालाड माइंडस्पेस या टप्प्यात २३६ झाडे तोडली जाणार असून ३९३ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. ही झाडे पवई उद्यानात लावली जाणार असून पनवेल परिसरात ६,१०७ झाडे लावण्यात येणार आहेत.
मालाड माइंडस्पेस परिसरातील एमडीपी रोड या उपनगरातील महत्त्वाच्या मार्गावर सर्वाधिक परिणाम होणार आहे. येथे एकूण ८१५ झाडे बाधित होणार असून त्यापैकी ११८ झाडे तोडली जाणार आहेत, तर ६९७ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तर पनवेल परिसरात ६,८०५ झाडे लावण्यात येणार आहेत.
माइंडस्पेस ते चारकोप टप्प्यात ४७ झाडे तोडण्यात येणार असून त्याबदल्यात ५७५ झाडे लावली जातील. तर गोराई इंटरचेंज ते दहिसर मार्गावर ८० झाडे तोडली जाणार असून १०२ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. या झाडांच्या बदल्यात २,२९२ झाडे पनवेलमध्ये लावण्याचा प्रस्ताव आहे. गोराई इंटरचेंजसाठी स्वतंत्रपणे १४० झाडे तोडण्याचा आणि ८ झाडांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी १,१९७ झाडे लावली जाणार आहेत. पवई उद्यानाची निवड केली असून पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून या प्रस्तावाला तीव्र विरोध केला जाणार आहे.
एकूण तोडली जाणारी झाडे - सुमारे १,०००
एकूण वृक्षलागवड - १९,५७३
लागवडीचे ठिकाण: पनवेल, रायगड
झाडांचे पुनर्रोपण ठिकाण: पवई उद्यान