मेघा कुचिक/मुंबई
गेल्या काही महिन्यांत मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि संपूर्ण बॅगाच चोरीला गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यातील अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
अलीकडेच घडलेल्या एका घटनेत मुंबईहून चेन्नईला प्रवास करणाऱ्या ३६ वर्षीय महिलेच्या बॅगेतून सोन्याचे झुमके, अंगठी आणि चांदीची साखळी चोरीला गेली. तिने सहार पोलिसांत तक्रार नोंदवली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याचबरोबर एका १९ वर्षीय आयरीश विद्यार्थिनीची कपडे आणि वैयक्तिक साहित्य असलेली संपूर्ण बॅगच विमानतळावरून गायब झाली.
तपासातील मोठी आव्हाने
चेक-इन, सिक्युरिटी स्क्रीन, सॉर्टिंग, लोडिंग आणि शेवटी कन्व्हेयर बेल्ट अशा अनेक टप्प्यांतून सामान जाते. त्यामुळे चोरी नेमकी कुठे झाली हे शोधणे कठीण जाते.
प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतरच दागिने किंवा वस्तू गायब असल्याचे लक्षात येते. तक्रार नोंदवण्यास उशीर झाल्यामुळे शेकडो कर्मचारी आणि प्रवाशांचा शोध घेणे जिकिरीचे बनते.
'मुंबई नॉर्थ सेंट्रल डिस्ट्रिक्ट फोरम' (एमएनसीडीएफ) चे सह-संयोजक युरिच कामथ म्हणाले, काही विमान कंपन्यांकडे अशा समस्या निवारणासाठी योग्य यंत्रणा नाही. बॅग योग्य रीतीने पोहोचली आहे की नाही किंवा तिचे नुकसान झाले आहे का, याबाबत त्या स्पष्टता देत नाहीत. कंपन्यांकडून सहकार्य न मिळाल्यामुळे पोलीस तपासातही अडथळे येतात.