मुंबई : देशातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या 'अटल सेतू'ने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या मार्गावरून २६ महिन्यांत २ कोटी वाहने धावली आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ९१ टक्क्यांहून अधिक खासगी कारनी अटल सेतूवरून प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे.
दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूमुळे प्रवासाचा वेळ एका तासावरून कमी होऊन २० मिनिटांपेक्षाही कमी झाला आहे. यामुळे प्रवासासाठी अधिकाधिक प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत. अटल सेतू १३ जानेवारी २०२४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तेव्हापासून या सेतूवरून २ कोटींहून अधिक वाहनांची वाहतूक नोंदवली गेली आहे.
२७ मार्च २०२६ रोजी २ कोटी ३१६ वे वाहन या सेतूवरून मार्गस्थ झाले. एकूण वाहतुकीच्या ९१ टक्क्यांहून अधिक म्हणजे १,८१,९५,७१८ खासगी कार्स, ५,९८,५२५ हलकी व्यावसायिक वाहने, मिनीबस, बस आणि ट्रक आणि १२,०६,०७३ मध्यम, अवजड आणि अति-अवजड वाहने या मार्गावरून धावली आहेत.
व्यापार, उद्योगाला चालना
केवळ दोन वर्षांहून अधिक कालावधीत या सेतूने केवळ वाहनांचीच नव्हे, तर अर्थव्यवस्थेचीही गती वाढवली आहे. तसेच व्यापार-उद्योगाला या सेतूमुळे मोठी चालना मिळाली आहे. अटल सेतूमुळे नवी मुंबईजवळील परिसराचा गेल्या दोन वर्षांत वेगाने विकास होऊ लागला आहे.