मुंबई : राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून, कशाप्रकारे लागू करावयाचे याबाबतचे धोरण निश्चित करण्याकरिता समिती राज्यातील विविध विभाग/जिल्हा स्तरावर भेटी देत असून मुंबई जिल्हा भेटीसाठी समिती २८ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संबंधित सर्वांशी संवाद साधणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
या भेटीदरम्यान ही समिती सामान्य नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित किंवा संलग्न शासकीय किंवा अशासकीय/ खासगी संस्था यांचे अध्यक्ष/ सदस्य, राजकीय पक्षांचे नेते/ लोकप्रतिनिधी, प्राथमिक/ माध्यमिक, शिक्षक संघटना यांचे अध्यक्ष सदस्य, पालक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आंदोलनकर्ते इत्यादींबरोबर संवाद साधणार असून त्रिभाषा धोरणासंदर्भात त्यांची मते व विचार जाणून घेणार आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे मुंबई जिल्ह्याकरिता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्याच दिवशी दुपारी ३ ते ५ वाजता ऑनलाईन व्ही.सी. द्वारे ठाणे/ रायगड/ पालघर या जिल्ह्यांकरिता संवाद साधला जाणार आहे. त्याकरिता प्रश्नावली व मतावली तयार करण्यात आलेली आहे.
मुंबई विभागातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या समन्वयाने हा दौरा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी व नियोजन करण्यात आले आहे. बैठकीत सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच महानगरपालिका व नगरपालिका शिक्षण मंडळांचे प्रशासनाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकाधिक तज्ज्ञ व्यक्तींना जिल्हास्तरीय चर्चासत्रासाठी निमंत्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदर चर्चासत्रासाठी मुंबई जिल्ह्यातून सुमारे ३०० जणांचा सहभाग अपेक्षित आहे.