मुंबई: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात मंगळवारी दोन लोकल ट्रेन समोरासमोर आल्या. मात्र, मोटरमनने वेळीच प्रसंगावधान दाखवत लोकल थांबवल्याने एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. या घटनेमुळे तब्बल अर्धा तास फलट क्रमांक ५ ते ७ वरील लोकल वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे सकाळपासून कोलमडलेले मध्य रेल्वेचे वेळापत्रक अधिकच विस्कळीत होऊन प्रवाशांचे हाल झाले.
बदलापूरहून आलेली एक लोकल सीएसएमटी स्थानकातील लोकल उभ्या असलेल्या फलाटाच्या दिशेने चालली होती. ही लोकल फलाट क्रमांक ४ ऐवजी - फलाट क्रमांक ५ वर आली. - त्यामुळे फलाट क्रमांक ५ ते ७ हे पूर्णपणे ब्लॉक झाले. लोकल फलाटासाठी असलेला सीएसएमटी इंटरनल होम सिग्नल हा लाल झाला होता. त्यामुळे मोटरमनने लोकल थांबवली. या दोन्ही - लोकलमध्ये १२० मीटरपेक्षा जास्त - अंतर होते. त्यामुळे सीएसएमटी स्थानकात मोठा अपघात टळला.
त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी अखेर लोकल मागे घेण्यात आली. या विचित्र घटनेमुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. अखेर चार वाजण्याच्या सुमारास सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र लोकल उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेचा तपास रेल्वे प्रशासनाने सुरू केला आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
बदलापूरहून येणारी लोकल दुपारी ३.१८ वाजता सीएसएमटी येथे आली. या लोकलला फलाट क्रमांक ४ ऐवजी फलाट क्रमांक पाचवरील सिग्नल देण्यात आला होता. सीएसएमटी येथे लोकल येण्यासाठी तीन सिग्नल पार करावे लागतात. यात सीएसएमटी येथील मुख्य होम सिग्नल पार करावा लागतो. त्यानंतर उपनगरीय फलाट होम सिग्नल आणि प्रत्येक फलाटाचा सिग्नल पार करावा लागतो. बदलापूरवरून आलेल्या लोकलला फलाट क्रमांक पाचवरील मुख्य होम सिग्नल दिला होते. त्यामुळे ही लोकल हा सिग्नल पार करून उपनगरीय फलाट होम सिग्नलवर थांबली. त्यामुळे दोन्ही लोकलमधील अंतर १२० मीटर उरले होते. अखेर ही लोकल मागे घेण्यात आल्यानंतर सुमारे चार वाजता लोकल सेवा सुरू करण्यात आल्याचे, मध्य रेल्वेच्या अधिकार्याने सांगितले.
सकाळीच बिघडले लोकलचे वेळापत्रक
खर्डी येथे पॉइंटच्या दुरुस्तीसाठी सोमवारी रात्री ११.२० ते रात्री ३.२० वाजेपर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक लांबल्याने पहाटे ५.५७वाजेपर्यंत काम सुरू होते. त्यामुळे सकाळपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि लोकल सेवेचे वेळापत्रक बिघडले. त्यातच अनेक मालगाड्या रेल्वे मार्गात बराच कालावधी उभ्या होत्या. त्यामुळे सकाळी - कामावर येण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.