मुंबई : जून महिन्यात जवळपास ४०० मिमी पावसाची नोंद होते. मात्र जून महिना संपत आला असून जुलै महिन्यात २०२५ मध्ये कुलाबा येथे ३७४.६ तर सांताक्रूझ येथे ७८६.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यात किती पाऊस बरसतो त्यावर पुढेचे नियोजन ठरेल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली तसेच यापूर्वी ही कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. यंदा जुलै महिन्यात पाऊस पडेल, अशी आशा आहे, अन्यथा कृत्रिम पावसासह अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असेही ते म्हणाले.
सात धरणातून मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात दररोज ५००० दशलक्ष लिटर उचलतो, परंतु पाणी गळती व चोरी यामुळे १ हजार दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे जलवाहिन्या बदलण्यासाठी आराखडा तयार करत असून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे १ ऑक्टोबरपासून जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. टँकर माफिया पद्धत मोडीत काढण्यासाठी ओटीपी बसेसवर टँकर बूक करणे याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एखाद्या सोसायटीने टँकर बूक केला तर ओटीपी येईल आणि स्पष्ट होईल की सोसायटीने टँकर बूक केला म्हणून. यामुळे पाणी चोरी थांबेल, असा विश्वास अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला. विहिरींचे पुनर्भरण करण्यावर भर दिला असून २६ वार्डातील विहिरींची माहिती घेतली असून स्वच्छता करण्यात येत आहे. स्वच्छतेनंतर पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी ते उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.