मुंबई : अनंत चतुर्दशीनंतर रात्री उशिरा घरी परतणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. २५ आणि २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष लोकल चालवण्यात येणार असून, या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. विसर्जनानंतर होणारी प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
चर्चगेटहून विरारच्या दिशेने धावणाऱ्या डाऊन मार्गावरील विशेष लोकल रात्री १.१५ ते पहाटे ३.४५ या वेळेत चालवल्या जातील. तर विरारहून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या अप मार्गावरील विशेष लोकल रात्री १२.१५ ते पहाटे ३ या कालावधीत धावतील. त्यामुळे विसर्जनानंतर उशिरा घरी परतणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी अतिरिक्त लोकल उपलब्ध होणार आहेत.
चर्नी रोडवर वाहतुकीत तात्पुरते बदल
अनंत चतुर्दशीच्या दिवशी २५ सप्टेंबरला चर्नी रोड स्थानकावरही काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पश्चिम रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टीने हे बदल केले आहेत.
२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत धावणाऱ्या ३७ जलद अप लोकलना मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. मात्र, १५ डब्यांच्या लोकलसाठी योग्य लांबीचे फलाट उपलब्ध नसल्याने तीन १५ डब्यांच्या लोकल ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स स्थानकांवर थांबणार नाहीत.
याशिवाय, अप मार्गावरील १०१ लोकलना सायंकाळी ५ ते रात्री ११.३० या वेळेत चर्नी रोडच्या फलाट क्रमांक २ वर थांबा दिला जाणार नाही. स्थानक परिसरात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अतिरिक्त तिकीट खिडक्यांचीही व्यवस्था
गणपती विसर्जनासाठी चर्नी रोड परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना तिकीट काढताना अडचणी येऊ नयेत, यासाठी अतिरिक्त तात्पुरत्या तिकीट खिडक्या सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. त्यामुळे सध्याच्या तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने केलेल्या या विशेष व्यवस्थेमुळे रात्री उशिरा परतणाऱ्या भाविकांना आणि प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.