मुंबईत उन्हाळ्याचा विक्रम, ऑरेंज अलर्ट जारी छायाचित्र : सलमान अनसारी
मुंबई

मुंबईत उन्हाळ्याचा विक्रम, ऑरेंज अलर्ट जारी

मंगळवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत मार्च महिन्यातील तिसऱ्या क्रमांकाचे उच्च तापमान नोंदवले गेले. येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सियस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ७.६ अंशांनी अधिक आहे. मार्चच्या सुरुवातीच्या काळात नोंदवले गेलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे.

Swapnil S

मुंबई : मंगळवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत मार्च महिन्यातील तिसऱ्या क्रमांकाचे उच्च तापमान नोंदवले गेले. येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सियस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ७.६ अंशांनी अधिक आहे. मार्चच्या सुरुवातीच्या काळात नोंदवले गेलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी आधी यलो अलर्ट जाहीर केला होता. मात्र वाढत्या उष्णतेचा विचार करून मंगळवारी दुपारपर्यंत तो ऑरेंज अलर्टमध्ये वाढवण्यात आला उत्तर कोकणात उष्णतेची तीव्र ते अतितीव्र लाट अनुभवास आली. सांताक्रूझ येथे ४०°C (७.६°C जास्त), दहानू येथे ४०°C (९.६°C जास्त) तर ठाण्यात ३९.२°C (५.४°C जास्त) तापमान नोंदवले गेले.

हवामान शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला होता; मात्र तापमान झपाट्याने वाढल्याने तो ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला. बुधवारी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट कायम राहणार आहे.

मंगळवारी उत्तर कोकणात ३६ ते ४०°C दरम्यान कमाल तापमान नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. राज्याच्या इतर भागांमध्येही तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिले. कोकणातील काही भागांत बुधवारीही उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवसांत कोकणातील कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही; त्यानंतर तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. कोकण विभागात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे येतात.

दरम्यान, हवामान खात्याने मार्च ते मे २०२६ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या अंदाजात मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान आणि एप्रिल-मे महिन्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उष्णतेची लाट सुरू झाल्याने यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

कमाल तापमानाच्या नोंदी (स्वयंचलित मापकांनुसार)

• राम मंदिर (ओशिवरा) : ४२.४°C

• विक्रोळी : ४१.६°C

• भायखळा : ४०°C

• वांद्रे : ३९.७°C

• विद्याविहार : ३९.५°C

• चेंबूर : ३८.८°C

• दहिसर : ३८.८°C

मुंबईबाहेर पाऊस शक्य

दरम्यान, पुढील दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या मुंबईसाठी पावसाची कोणतीही शक्यता दिसत नाही.

जिल्हानिहाय अंदाजानुसार, १३ व १४ मार्च रोजी चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच परभणी, बीड, लातूर, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांतही हलका पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

ठाणेकरांनो लक्ष द्या! उद्या अनेक भागांतील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद; वाचा महत्त्वाची माहिती