मुंबई : बारावी निकालात मुंबई विभागाचा सर्व शाखांचा एकत्रित निकाल ९०.०८ टक्के लागला आहे. राज्याच्या निकालाप्रमाणेच मुंबई विभागाचा निकालात मोठी घसरण झाली आहे. यंदा मुंबईचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २.८५ टक्क्यांनी घटला आहे, तर मुंबईच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
गेल्या वर्षी २०२५ मध्ये बारावीचा निकाल ९२.९३ टक्के लागला होता. या परीक्षेसाठी मुंबई विभागातून ३ लाख ५ हजार ११८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ३ लाख १४ हजार १४४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी २ लाख ९१ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या तुलनेत २०२६ च्या परीक्षेसाठी मुंबई विभागातून ३ लाख २४ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये १ लाख ६५ हजार ९३३ मुले, तर १ लाख ५८ हजार ८०६ मुलींचा समावेश होता.
यापैकी ३ लाख २३ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १ लाख ६५ हजार २३० मुले, तर १ लाख ५८ हजार २७१ मुली होत्या. परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९१ हजार ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १ लाख ४५ हजार ४०२ मुले तर १ लाख ४६ हजार १३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८७.९९ टक्के असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.२५ टक्के आहे. मुंबई विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल ९५.६४ टक्के लागला आहे.
१ लाख १७ हजार ७५३ विद्यार्थी पास
बारावी परीक्षेला १ लाख २३ हजार ११५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख १७ हजार ७५३ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये ९४.९७ टक्के मुले, तर ९६.४० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गतवर्षी विज्ञान शाखेचा निकाल ९६.३३ टक्के लागला होता. या निकालाच्या तुलनेत यंदा मुंबईच्या विज्ञान शाखेच्या निकालात ०.६९ टक्क्यांची अत्यल्प घट झाली आहे, तर वाणिज्य शाखेच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ५.६१ टक्क्यांची घसरण झाली आहे. वाणिज्य शाखेतून १ लाख ५६ हजार ९०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ३६ हजार ४७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६९ हजार ९४४ मुले, तर ६६ हजार ५३० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
कला शाखेची मुले हुशार
निकालात घसरण झाली असली तरी मुंबई विभागाच्या कला शाखेच्या निकालात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी कला शाखेचा निकाल ८४.६३ टक्के लागला होता, तर यंदा कला शाखेच्या निकालात किंचित वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या निकालात ०.५६ टक्के अशी किंचित वाढ झालेली आहे.