मुंबई : अतिक्रमणमुक्त मुंबईतील फुटपाथ यावर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी भर दिला आहे. मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा, या उद्देशाने महापालिकेमार्फत ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.
पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे व इतर सर्व प्रकारचे अडथळे तत्काळ हटवून पदपथ पूर्णपणे अडथळामुक्त करावेत. तसेच पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे सक्त निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी दर १५ दिवसांनी आढावा घ्यावा, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.