मुंबई : मुंबई महापालिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत मुंबईच्या किनाऱ्यावर ९३ जीवरक्षक तैनात असून, या संख्येत वाढ करून १३७ इतकी करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने खासगी संस्थेला तीन वर्षांच्या करारावर काम देण्यासाठी निविदा काढली आहे.
मुंबईला १४५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून १२ किनारे हे नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. यापैकी गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, गोराई आणि अक्सा या सहा समुद्रकिनाऱ्यांवर बुडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुहू किनाऱ्यावर नुकताच दोन तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर गेल्या वर्षी आठ जणांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने जीवरक्षकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईच्या किनाऱ्यावर ९३ जीवरक्षक तैनात असून यांची संख्या वाढवून १३७ इतकी करण्यात येणार आहे. तैनात करण्यात येणारे जीवरक्षक हे प्रशिक्षित असून समुद्रात बुडणाऱ्यांचा शोध घेणे, बचाव कार्य करणे तसेच आपत्कालीन प्रसंगी मदत करणे अशी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. या संस्थेकडून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसोबतच जेटस्की, बोट, बॉई, ट्यूब अशा बचाव उपकरणांचीही व्यवस्था करावी लागणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
सहा रोबोटिक ड्रोन खरेदी करणार
मुंबईच्या किनाऱ्यांवरील पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. नियमानुसार प्रत्येक १०० मीटर अंतरावर किमान एक जीवरक्षक तैनात असणे बंधनकारक आहे. परंतु, मुंबईच्या किनाऱ्यांवर सध्या इतके जीवरक्षक नाहीत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. तसेच पालिका नवीन सहा रोबोटिक ड्रोन खरेदी करणार असून यासाठी निविदा काढली आहे. या ड्रोनच्या माध्यमातूनही बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवता येईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.