मालाड पूर्व परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चेंडू आणण्यासाठी गेलेला हा मुलगा पाण्याने भरलेल्या बांधकामाच्या खड्ड्यात पडल्याने ही दुर्घटना घडली. दिव्यांश राजेश मौर्य असे मृत मुलाचे नाव आहे.
चेंडू आणण्यासाठी गेला अन्
ही घटना गुरुवारी, १९ मार्च रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आंबेवाडीतील छगन पटेल चाळ येथे घडली. माऊली कन्स्ट्रक्शनकडून खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. दिव्यांश चेंडू आणण्यासाठी गेला असता तो चुकून या खड्ड्यात पडला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कुरार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. मुलाला खड्ड्यातून बाहेर काढून उपचारासाठी कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तपास सुरू
या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस उपनिरीक्षकांकडून करण्यात आली असून, नेमक्या परिस्थितीचा अधिक तपास सुरू आहे.