मेट्रो लाईन ९ च्या पहिल्या टप्प्याचे ६ एप्रिल रोजी होणाऱ्या उद्घाटनापूर्वीच स्थानकाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. पांडुरंगवाडी स्थानकाचे नाव बदलून 'पेणकरपाडा' ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. स्थानक पेणकरपाडा परिसराच्या अधिक जवळ असल्याचे सांगत नागरिकांनी प्रशासनाकडे ही मागणी केली आहे.
स्थानिकांनी मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर 'पेणकरपाडा'चे फलक लावल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. तसेच, नावात बदल न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
स्थानकाच्या अंतरावरून वाद
नागरिकांच्या मते, पांडुरंगवाडी हे ठिकाण स्थानकापासून सुमारे १ किमी अंतरावर आहे, तर पेणकरपाडा हा भाग स्थानकाच्या अधिक जवळ आहे. त्यामुळे स्थानकाचे नाव प्रत्यक्ष स्थानाशी सुसंगत ठेवावे, अशी मागणी पुढे आली आहे.
याच पार्श्वभूमीवर ३ एप्रिल रोजी दुपारी काही स्थानिक तरुणांनी पांडुरंगवाडी मेट्रो स्थानकावर आंदोलन केले. त्यांनी स्थानकावरील नामफलकावर कागद चिकटवून ‘पेणकरपाडा’ असे नामकरण केले. तसेच, शासनाने अधिकृतपणे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
४.५ किमीचा महत्त्वाचा टप्पा
मेट्रो लाईन ९ चा पहिला टप्पा ४.५ किमी लांबीचा असून दहिसर पूर्व ते काशीगाव असा मार्ग जोडतो. या मार्गावर पांडुरंगवाडी आणि मिरागाव ही स्थानके आहेत. हा प्रकल्प उत्तर उपनगरांतील प्रवास सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
प्रवासासाठी दिलासा ठरणार
मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांना सध्या मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर जलद आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दहिसर पूर्व येथे ही लाईन मेट्रो लाईन ७ ला जोडली जाणार असून, त्यामुळे मिरा रोड परिसरातून अंधेरी पूर्वपर्यंत थेट प्रवास शक्य होणार आहे.
२ एप्रिलला यशस्वी चाचणी धाव
या टप्प्याची २ एप्रिल रोजी काशीगाव ते दहिसर दरम्यान यशस्वी चाचणी धाव पार पडली. त्याआधी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थळ पाहणी करत सुरक्षा आणि तांत्रिक तयारीचा आढावा घेतला होता.