मुंबई : जागतिक ऊर्जा संकट आणि आयात शुल्कात झालेली वाढ यांमुळे मुंबई महानगर क्षेत्रात सीएनजीच्या दरात प्रति किलो दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईत आता सीएनजीसाठी प्रति किलो ८४ रुपये मोजावे लागणार आहेत. १३ आणि १४ मेच्या मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले असून यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
जागतिक बाजारपेठेतील घडामोडी, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचे अवमूल्यन यांमुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात नमूद केले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे १२.८४ लाख वाहने सीएनजीवर धावतात, ज्यामध्ये ४.७ लाख रिक्षा, १.६ लाख टॅक्सी आणि ५ लाखांहून अधिक खासगी कारचा समावेश आहे. या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार असल्याने संघटनांकडून आता भाडेवाढीची मागणी जोर धरू लागली आहे. भारतीय जनता पार्टी टॅक्सी रिक्षा आघाडीचे अध्यक्ष के. के. तिवारी यांनी या दरवाढीला विरोध दर्शवला असून महागाईने होरपळणाऱ्या चालकांसाठी सरकारने सबसिडी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा चालकांचा प्रति किलोमीटरचा खर्च १८.३० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता परिवहन युनियनने वर्तवली आहे.
रिक्षा-टॅक्सी भाडे वाढणार?
सीएनजीच्या दरात वाढ झाली असली तरी पेट्रोलच्या तुलनेत यामध्ये ४४ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत ७ टक्के बचत होत असल्याचा दावा महानगर गॅसने केला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार हे स्पष्ट आहे. रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींनी लवकरच भाडेवाढी संदर्भात प्रशासनासोबत चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे येणाऱ्या दिवसांत मुंबईकरांचा प्रवास अधिक महाग होण्याची शक्यता आहे.