मुंबईच्या डबेवाल्यांनाही मुसळधार पावसाचा फटका; आज सेवा बंद संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai Rain : मुंबईच्या डबेवाल्यांनाही मुसळधार पावसाचा फटका; आज सेवा बंद

मुंबईतील मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि लोकल रेल्वेतील अडथळ्यांमुळे मुंबई डबेवाला संघटनेने आजची डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

Mayuri Gawade

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा फटका आता मुंबई डबेवाला सेवेलाही बसला आहे. सलग पाऊस, पूरस्थिती आणि उपनगरी रेल्वे सेवेत झालेल्या अडथळ्यांमुळे मुंबई डबेवाला संघटनेने सोमवारी एक दिवसासाठी डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी 'इंडिया टीव्ही'शी बोलताना सांगितले की, विरार-वसई परिसरात राहणाऱ्या अनेक डबेवाल्यांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तसेच अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्याने आणि उपनगरी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने डबेवाल्यांना प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून आजची सेवा स्थगित करण्यात आली आहे.

उल्हास मुके म्हणाले, "विरार-वसई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक डबेवाल्यांची घरे पाण्याखाली गेली आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवरही पाणी साचले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आजची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे." यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन संघटनेने दिलगिरीही व्यक्त केली आहे.

रेल्वे विस्कळीत झाल्याने निर्णय

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा उशिराने सुरू आहे. मुंबईतील हजारो डबे वेळेवर पोहोचवण्यासाठी डबेवाले प्रामुख्याने उपनगरी रेल्वेवर अवलंबून असतात. त्यामुळे रेल्वे सेवेत अडथळे आल्याने वेळेत डबे पोहोचवणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला.

१२५ वर्षांच्या परंपरेला अपवाद

मुंबई डबेवाला संघटनेने सांगितले की, पूर, संप आणि विविध संकटांच्या काळातही गेल्या १२५ वर्षांपासून सेवा अखंड सुरू ठेवण्याची परंपरा आहे. मात्र, यावेळी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एक दिवसासाठी सेवा स्थगित करण्यात आली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून, ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे आणि अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड