मुंबईत झाड, झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर घडतात. १६ मे २०२३ ते १६ मे २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीत झाडे अथवा फांद्या कोसळून झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू, तर १२५ जण जखमी झाले आहेत. चेंबूर येथे मंगळवारी शाळेच्या बसवर झाड कोसळण्याच्या घटनेनंतर मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तीन वर्षांच्या कालावधीत अनेक गंभीर दुर्घटना घडल्या. ऑगस्ट २०२५ मध्ये अंधेरी (पूर्व) येथील सहार रोडवर झाड कोसळून ४० वर्षीय जयंत गोसावी जखमी झाले होते. त्यांच्यावर तातडीने कूपर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण मुंबईतील कारमायकेल रोडवर भेंडीचे (इंडियन ट्युलिप) मोठे झाड कोसळल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दोन कारचे नुकसान झाले, तसेच जवळपास तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.
जुलै २०२४ मध्ये वरळी येथील बीडीडी चाळ परिसरात वडाच्या झाडाची मोठी फांदी कोसळून ४५ वर्षीय अमित जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी परळ बस डेपो परिसरात वडाचे झाड कोसळल्याने ५७ वर्षीय वर्षा कांतीलाल मिस्त्री या बेघर महिलेचा मृत्यू झाला. ५ जुलै २०२४ रोजी दादर कबूतरखाना परिसरात झाड कोसळून दोन वाहनांचे नुकसान झाले होते.
याशिवाय १० मे रोजी खार येथील लिंकिंग रोडवर रिक्षावर झाड कोसळल्याच्या दुर्घटनेत १५ वर्षीय आरिका श्रीवास्तव आणि २१ वर्षीय हर्षिता गंभीर जखमी झाल्या, तर १९ वर्षीय मानसवी श्रीवास्तव आणि रिक्षाचालक किरकोळ जखमी झाले.