मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राने (सीडीओई) जाहीर केलेल्या प्रथम वर्ष बीकॉम आणि बीएच्या निकालात गोंधळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ८० टक्के विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
‘बीकॉम’च्या पहिल्या सत्राच्या परीक्षेला २ हजार ५४३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ८६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, ४५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे बीएच्या पहिल्या सत्राची परीक्षा २ हजार २२४ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील १ हजार ७६४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, फक्त ४६० विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.
विद्यापीठाच्या गैरकारभाराबाबत नाराजी
‘सीडीओई’मध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे नोकरी करत शिक्षण घेतात. त्यामुळे परीक्षा आणि निकालातील विलंब किंवा प्रक्रियेतील गोंधळाचा त्यांच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाच्या या गैरकारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
‘एटीकेटी’ असतानाही पुढील वर्षात प्रवेश
एका किंवा अधिक विषयांमध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्यास त्यांना अनुत्तीर्ण असा शेरा दिला जात आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात प्रवेश दिला जात आहे. प्रथम वर्षातील सर्व ‘एटीकेटी’ प्रलंबित असतानाही पुढील वर्षात विद्यार्थ्याला प्रवेश देण्याची तरतूद असल्याने विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असेही मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नसून, ‘एटीकेटी’च्या परीक्षा २५ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहेत, असेही सांगण्यात आले.